लिखाणाबद्दलचं 'लिखाण'
खूप दिवस काही लिहिलं नाही की एक वेगळीच तगमग सुरू होते मनात. काही तरी लिहिलं पाहिजे असं सतत वाटत राहतं आणि काय लिहावं हा प्रश्न सतावत राहतो. खरंतर लिहीणं हे खूप जास्त विचार करून लिहीण्यापेक्षा ते सरळ सोप्पं त्या क्षणाला वाटेल तसं नैसर्गिक असावं असं मला नेहमी वाटतं... अगदी candid! उगाच बढेजाव नाही, नाटकीपणा नाही, जे वाटलं ते सरळ-साध्या भाषेत कागदावर उतरवत जावं. कागदावर उतरवत असताना सुद्धा शेवट कधीच माहीत नसतो पण त्या शेवटाकडे चाललेला प्रवास मात्र खूप नव्या जाणीवा करून देत असतो. जाणीव... मेंदूत चालू असलेल्या गुंतागुंतीची, जाणीव... सतत चालू असलेल्या विचारचक्राची, जाणीव... पटपट कागदावर उमटणाऱ्या अक्षरांची आणि जाणीव... घडू पाहणाऱ्या नवनिर्मितीची! ह्या लिखाणाचा प्रवास आणि आपला जगण्याचा प्रवास यात खूप साम्य जाणवत मला... उद्या काय आहे माहीत नाही... पण आज जे वाटतंय ते करून मोकळं व्हावं... होणाऱ्या चुका नंतर निस्तराव्यात, पण त्या क्षणाचा आनंद घ्यावा. कशी गंमत असते ना, खूप दिवस विचार करून, एखादा विषय समजून-उमजून, त्यावर अभ्यास करून लिहिणं आणि सहज सुचलं च्या caption खाली बिनधास्...